मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कॉंग्रेससोबत युतीचे मार्ग बंद झाले अशी घोषणा केली. तसेच, त्यांनी शिवसेनेला एक सल्लादेखील दिला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा ‘राहुल गांधी’ होऊ द्यायचा नसेल तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं युतीत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद वंचित बहुजन आघाडीकडे जाईल, असं विधान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर भाष्य करताना निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी विरोधात नसेल, तर सत्तेत असेल असं आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या ‘गॅस सिलिंडर’ निशाणीचा उल्लेख करत विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे भाजप गॅसवर असेल, असंही ते पुढे म्हणाले.

याशिवाय EVM विरोधाच्या मुद्द्यावर ते ठाम असल्याचे सांगीतले. एका हॅकरने माझ्याशी संपर्क साधला असून पुढच्या काळात कोर्टात EVM हॅकिंगचा मुद्दा मांडणार आहे, असं आंबेडकरांनी सांगीतले. काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. ‘काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकारी मंडळ सदस्यांचा सतत संपर्क होता.

मात्र काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वदेखील चर्चा करण्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत असल्याचं या परिस्थितीत वारंवार स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीवेळी आलेला अनुभव पुन्हा एकदा आम्हाला आला. काँग्रेस आघाडीसाठी उत्सुक आहे. मात्र वंचितच त्यासाठी तयार नाही, असं चित्र काँग्रेसकडून निर्माण केलं जात आहे’, अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

अन्यथा आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल: प्रकाश आंबेडकर