मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महायुतीला जनमत दिले आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एकीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रामक भुमिका मांडताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भारतीय जनता पक्षाला टोला लगावता दिसत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊतांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत एक टोला लगावला आहे.

पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे अशा शब्दात तरुण भारत या दैनिकाने शिवसेनेवर प्रहार केले आहेत.

खासदार संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक असल्याची टीका तरुण भारतने अग्रलेखातून केली. परंतु या टीकेवर उत्तर देताना ज्याप्रकारे मुख्यमंत्री सामना वाचत नाही, तसं आम्ही पण सामनासोडून काही वाचत नाही, तर तरुण भारत वृत्तपत्र आहे का? हेच माहीत नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तरुण भारतची खिल्ली उडविली आहे. त्यामुळे येत्या काळात तरुण भारत आणि सामना यांच्यातील सत्तासंघर्ष पाहायला मिळू शकतो.

‘तरुण भारत’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे…

  1. माध्यमांमध्ये फडणविसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात ‘विदूषक’ म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे.
  2. एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल?
  3. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप कुठल्याही क्षणी दावा करू शकतो आणि शपथविधी सुद्धा लगेच होऊ शकतो. बहुमत वगैरे पुढच्या हिवाळी अधिवेशनात सिद्ध करता येईल.
  4. रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी ९ वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?
  5. ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो.

‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? तरुण भारतचा प्रहार