मुंबई: दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य करायला नको होते, अशी नवनिर्वाचित आमदारांसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मन की बात’ बोलून दाखविल्यानंतर काही तासांतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पडद्यामागे राजकारणाचा सारीपाट बदलण्याचे दबावतंत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आम्ही भाजपसोबत नाही, अशी जाहीर आणि ठाम भूमिका घेतल्यास दुसर्‍याक्षणी आमचा त्यांना बाहेरून जाहीर पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.‘हीच ती वेळ’ आहे शिवसेनेला स्वाभिमान दाखविण्याची आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची, अशी कोपरखळी काँग्रेसच्या एका नेत्याने मारली.

सरकार स्थापण्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू झालेल्या खडाखडीच्या पार्श्वभूमीवर सेनेला चुचकारण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केली आहे. शिवसेनेबरोबर हातमिळवणी करणे काँग्रेसला शक्य नसले तरी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला मदत करून भाजपची कोंडी करण्याचा दोन्ही काँग्रेसचा प्रसत्न आहे. दुसरीकडे गृह, नगरविकास , महसूल आणि वित्त या चारपैकी दोन महत्त्वाची खाती मिळावीत म्हणून शिवसेना अडून बसली आहे.

दरम्यान, गृह, वित्त, नगरविकास वा महसूल यापैकी कोणतेही खाते शिवसेनेला देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेना मात्र त्यापैकी दोन खात्यांबद्दल आग्रही आहे. या बाबत एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत भाजपला कळविण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

त्यामुळे ऐन दिवाळीत ‘मी पुन्हा येईन’, असे प्रसार माध्यमांना ठणकावून सांगणार्‍या भाजपच्या गोटात कमालीची शांतता आहे. तर संजय राऊत या आपल्या विश्वासू शिलेदाराला पवारांच्या दरबारी पाठवून उद्धव ठाकरे हे एक घाव दोन तुकडे करण्याच्या विचारापर्यंत आल्याचे शिवसेनेच्या एका कॅबिनेट मंत्र्यांने राज्यपालांच्या भेटीनंतर सुतोवाच केले आहे.

युतीच्या सत्तावाटपाची चर्चा मंगळवारी होणार होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेनेने ती बैठकच रद्द केली. तेव्हापासून काल आणि आजही दोन्ही पक्षांमध्ये चर्चाच होऊ शकलेली नाही. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी, युती करण्यातच भाजप, शिवसेना व राज्याचेही भले असल्याचे विधान करून मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेचा सूर नरमाईचा झाल्याचे संकेत दिले होते. तथापि, त्यानंतर काहीच तासात पुन्हा आक्रमक होत शिवसेनेने भाजपवर दबाव वाढविला आहे.

युतीत तणाव वाढला, सेनेच्या आघाडीतील नेत्यांशी भेटीगाठी