पंढरपूर : विठूरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून गेलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे वारकरी शेतकरी दांपत्याच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडली. मागील वर्षीच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा विरोध झाल्याने मुख्यमंत्र्यांना मुंबईतील वर्ष या निवासस्थानीच विठ्ठलाची पूजा करण्याची वेळ आली होती.
विशेष म्हणजे आज प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्निक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दांपत्याच्या हस्ते परंपरेनुसार पूजा करण्यात आली. दरम्यान महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली.
योगपूजा…
ज्ञानपूजा…
रंगपूजा…
पांडुरंग पूजा…आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबा-रखुमाईचे आज पहाटे मनोभावे पूजन केले! pic.twitter.com/TPBvyabRv3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2019
राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आज विठ्ठला चरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी अहमदपूरच्या वारकरी चव्हाण दाम्पत्याला या महापूजेचा मान मिळाला.
