संगमनेर: महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेतली तेव्हाचा धक्का मोठा होता की संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल झाल्याचा? या प्रश्नावर आदित्य यांनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिलं. ‘उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्यानं मी कुठल्याही गोष्टीचा धक्का घेत नाही. त्यामुळं मला या दोन्ही घटनांचा धक्का बसला नाही. शिवाय, आमची मैत्री पक्की असल्यानं धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. धक्का बसलेले विधानभवनात आमच्या समोर आहेत,’ असा टोला त्यांनी भाजपला हाणला.
नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यापैकी कोणाचा राग जास्त येतो, असं विचारलं असता आदित्य म्हणाले, ‘राजकारणात जे काही घडतं, तो त्याचा एक भाग असतो. त्याचा राग मनात ठेवायचा नसतो. मी सुद्धा या सगळ्याकडं त्याच दृष्टिकोनातून पाहतो.’
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे सोपे आहे, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.
आदित्य ठाकरे यांना रॅपिड राउंड मध्ये विचारले गेलेले प्रश्न;
१. कोण जास्त आवडतं? अजित पवार की देवेंद्र फडणवीस- अजित पवार
२. जवळचं कोण? आई की बाबा – आईबाबा
३. भाजपमधील जवळचा नेता कोण?- पंकजा मुंडे की एकनाथ खडसे – महाविकास आघाडीसाठी दोन्ही जवळचे
४. सर्वाधिक धक्का कधी बसला? अजित पवारांनी पहाटे शपथ घेतल्यावर की संजय राऊत लीलावतीत गेल्यावर – दोन्ही नाही
५. सर्वाधिक ऐकलेलं वाक्य? आमची चर्चा सुरु आहे, चर्चा सकारात्मक होत आहे की मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि
शपथविधी शीवतीर्थावर – दोन्ही
६. कोणाचा जास्त राग येतो? राज ठाकरे की नारायण राणे – उत्तर टाळलं
Web Title: Who gives you more anger MP Narayan Rane or Raj Thackeray.
