मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये मोठे बदल केले गेल्याचे दिसत आहे. त्यात ज्यांची मंत्रीपदी किंवा इतर मोठ्या पदांवर वर्णी लागली आहे त्यांना जुन्या जवाबदारीतून मुक्त करून नव्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावर वर्णी लागताच त्यांना महाराष्ट्र भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यापदावर वर्णी लागली आहे तर मुंबई अध्यक्ष पदी आमदार मंगल प्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांनी काल अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.
पदभार स्वीकारल्यानंतर लोढा यांनी ‘पक्षाची परंपरा असते, झाडं कोणी लावतो तर फळं दुसरा चाखतो. तसंच आज जी गर्दी झाली आहे ती माझ्यामुळे नाही तर मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामुळेच’ अशा शब्दात आशिष शेलार यांची स्तुती केली तर ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व फक्त राजकीय नाही तर कामाचे नेतृत्व आहे. मला गर्व आहे देवेंद्र यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.
दरम्यान, २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत ४८ तास आधी युती तुटली. तेव्हा आपल्या १५ जागा आल्या. आता युती झाली आहे. मुंबईत ३६ -० अशी मॅच जिंकायची आहे, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. त्यामुळे सर्वाधिक आमदार देणाऱ्या मुंबई शहरावर भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले जात आहे.
