मुंबई: २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली. मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्यानंतर लगेच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत केमिस्ट, दवाखाने याबरोबर आता हॉटेल्स, मॉल, दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण याच नियमाच्या आडून डिस्को, पब, बार, लेडीज बार २४ तास सुरू राहिल्यास पेज-३ आणि पब संस्कृतीत चिंब बुडालेली उच्च वर्गातील तरुणाई शहरात अक्षरशः अधिकृत थैमान घालण्यास सज्ज होणार आहे. अर्थात सरकारच्या या निर्णयाचा त्यांना आनंदच होईल आणि मतपेटीत अजून एक वर्ग जोडला जाईल जो जवळपास अल्प प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतो. त्यामुळेच नाईट लाईफचा पहिला प्रयोग मुंबईतील त्याच नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल याच भागात राबविण्यात येणार आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये सर्वाधिक रोजगार हा खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्या देतात आणि यातील ७५ टक्के कंपन्या २४ तास ३ शिफ्टमध्ये सुरूच असतात. याच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षित तरुणाई नोकरी करतात. मात्र नाईट शिफ्ट’मध्ये काम करणाऱ्या या तरुणाईला रात्रीच्या वेळेत उपलब्ध न होणाऱ्या हॉटेल्स, मॉल्स, दुकानं आणि इतर मौज मजेच्या गोष्टी उपलब्ध झाल्याने ते देखील सरकारवर नक्कीच खुश होतील. त्यात, आज पर्यंत केवळ रिक्षा आणि टॅक्सीचा धंदा डे-नाईट चालत आला आहे, मात्र या निर्णयामुळे दुकानं आणि छोटे-मोठे उद्योग देखील दोन शिफ्ट’मध्ये चालण्यास हळूहळू सुरुवात होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे अनेक आस्थापनांचा गल्ला जो रात्री थंड असतो, तो रात्री देखील दिवसाच्या तुलनेत कमी का होईना पण खेळता राहील असा अंदाज व्यक्त होतो आहे. अर्थात हा आर्थिकदृष्ट्या खुश होणारा वर्ग सरकारच्या निर्णयाचं स्वागतच करेल अशी शक्यता आहे. कारण वेळेची मर्यादा नसल्याने पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या जाचातून देखील कायदेशीर सुटका होणार आहे.

त्यात पालिका प्रशासनाच्या मिळकतीचे उपक्रम ज्यामध्ये राणीची बाग आणि इतर करमणुकीचे उपक्रम देखील रात्री फुलून जातील आणि त्याचं कारण म्हणजे रात्री उपलब्ध असणाऱ्या हॉटेल्स, मॉल्स, दुकानं अशा महत्वाच्या गोष्टी हेच कारण असेल. सुरुवातीला काहीसा विरोध करणारा सर्वसामान्य माणूस हळूहळू स्वतःही त्या गोष्टीला विरंगुळा म्हणून घेईल आणि सरकारने नाईट-लाईफ सुरु केली असली तरी सरकारने ते अनुभवण्याची कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. असं ही मुंबईत ३६५ दिवसांपैकी २०० दिवस हे किंवा ते सण, उत्सव, खाजगी-सार्वजनिक कार्यक्रम सुरूच असतात आणि त्यामुळे कालांतराने सरकारचा हा निर्णय लोकांच्या आणि विशेष करून तरुणाईच्या पचनी पडेल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. मुंबईमध्ये जसा दिवसा राबणारा एक मोठा वर्ग आहे तसा रात्री राबणारा देखील मोठा वर्ग आहे. त्यामुळे सुरुवातीला टीका-टिपण्या झालेला विषय मुंबईकरांच्या आयुष्याचा भाग होईल. अर्थात, सामान्यांसाठी सध्या वरवरचा वाटणारा विषय नंतर मोठ्या वोटबँकेत परिवर्तित होणार हे मात्र निश्चित आहे.

 

Web Title:  Environment Minister Aaditya Thackeray Politics behind Night Life in Mumbai.

मी मुंबईकर ते नाईट लाईफ आणि त्यामागील राजकीय फायदे: सविस्तर वृत्त