मुंबई: राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे आणि त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी देखील सामील होणार असल्याने भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं सध्या चित्र आहे. मागील ४-५ वर्षांपासून काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपाची उलटीगिणती सुरु झाल्याचं सध्या राजकीय वातावरण आहे. त्यात मेहनतीने राज्यात काँग्रेसची सर्व नैतृत्व संपवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या भाजपाची सर्व स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते सत्तेत सामील होऊन पुन्हा राज्यभरात पक्ष मोठा करतील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गळाला लावतील अशी शक्यता भारतीय जनता पक्षाला वाटू लागली आहे, अशी जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. स्वतःचा मोठा पारंपरिक मतदार असल्यामुळे काँग्रेसला राज्यात संपवणं भाजपाला शक्य झालं नाही. भारतीय जनता पक्ष केंद्रात, राज्यात आणि जवळपास सर्वच महापालिकांमध्ये सत्तेत असून देखील काँग्रेस-राष्ट्र्वादीने जवळपास शंभरच्या आसपास जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेमुळे ते स्थानिक पातळीवर अजून मुसंडी घेतील अशी भीती भारतीय जनता पक्षाला आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना काही करून रोखणे किंवा त्यांच्या राजकारणाला लगाम घालत,त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून सर्व प्रयत्न होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठा राजकीय गर्तेत अडकलेल्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना पुन्हा मोठं होऊ देता कामा नये अशी व्यूहरचना भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय आखत आहे असं वृत्त आहे.
त्याचाच पहिला प्रत्यय म्हणजे कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची अंमलबजावणी संचलनालयाकडून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. सदर आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकासआघाडीचं नवं सरकार स्थापन होत आहे. या नव्या सरकारमध्ये अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
आज काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना यांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार आता सत्तेत येणार आहे. नव्या सरकारमध्ये अशोक चव्हाण हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच पुन्हा एकदा ही चौकशी सुरू झाल्यास त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी ईडीनं पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू केली. ईडीचे अधिकारी बुधवारी आदर्श गृहनिर्माण सोसायटीत दाखल झाले आणि त्यांनी त्यातील घरांची मोजणीही केली. याबाबत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
