मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवत आहेत, तर दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील मूळ प्रश्नांना हात घालून त्याच्या समस्या सोडविण्याचे कार्य करून सामान्य माणसाच्या मनात घर करत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटाआड गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच होता. मनसेच्या निरंतर पाठपुराव्याने स्वातंत्र्याच्या तब्बल ७१ वर्षांनंतर अखेर या पाड्यात वीज पुरवठा झाला आणि पाड्यातील घर अन् घर उजळून निघाले. जणु आपले आयुष्यच उजळून निघाल्याचा आनंद प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक शाखाध्यक्ष महेश लक्ष्मण नर यांनी सातत्याने पाठपुरावा आणि निवेदने देऊन अखेरीस या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचली असल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी अमित राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेऊन पक्षाचे आभार मानले तसेच प्रेमाची भेट म्हणून गावात उत्पादन करत असेलेली फळे व भाजीपाला भेट दिला.

भाईंदरच्या उत्तन – गोराई मार्गापासुन सुमारे ३ किलोमीटर आत डोंगराच्या खाली वसलेला जामझाड हा ५२ उंबरठ्यांचा आदिवासी पाडा. मुंबईच्या हद्दीत आणि भाईंदरच्या वेशीवर असलेल्या पाड्यात जेमतेम दोनशेची लोकवस्ती आहे. अदानी या वीज कंपनीने जामझाड पाड्यात वायर टाकण्याचे काम सुरू केले होते. ते या आठवड्यात पूर्ण झाले असून, आता हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे. कित्येक वर्षांपासून आपल्याकडेही वीज येईल, या प्रतीक्षेत गोराई येथील या पाड्यातील नागरिक होते. येथील कुटुंबांना लवकरात लवकर वीजसेवेचा आनंद घेता येईल, याची खातरजमा कंपनीच्या टीमने स्थानिकांच्या मदतीने केली. ३ मे रोजी पहिल्यांदा येथे विजेचा दिवा सुरू झाला, तेव्हा ग्रामस्थांनी एकत्र येत आनंद साजरा केला. येथे वायर टाकण्याचे काम सुरू झाल्यापासून आपली घरेही प्रकाशात उजळून निघण्याची प्रतीक्षा करणारी लहान मुलेही आनंदी होती.

गोराई जामझाड पाड्यात ७१ वर्षांनी वीज; मनसे शाखाध्यक्ष महेश नर यांच्या लढ्याला यश