मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. गोरेगाव, मीरा रोड, लालबाग, परळ, या ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये पाणी महापौरांच्या नजरेतून केवळ ‘साचण्यास’ सुरूवात झाली आहे. अंधेरी, वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये देखील पाणी साचल्याचं वृत्त आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरची उड्डाणं देखील खराब हवामानामुळे थांबवण्यात आली आहेत. मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने एएनआयला ही माहिती दिली आहे.

दरम्यान मागील आठवड्यात पावसाने मुंबई शहराची दाणादाण उडवली होती. मध्य रेल्वे १६ तास बंद झाली होती. शनिवारी देखील पावसामुळे मुंबईतल्या मुलुंड स्थानकात पावसामुळे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले होते. ज्यामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला होता. अजून तरी कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांची त्रेधा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उडालेली नाही. परंतु पावसाचा बेस्ट बस सेवेवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रूळांवर देखील पाणी साठलं होतं जे आता ओसरण्यास झाली आहे.

लालबाग, परळ हिंदमाता परिसरात पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. सायनजवळच्या गांधी मार्केटमध्येही पाणी साठलं आहे. त्यामुळे बेस्ट बस सेवेची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे दुपारी आणि दुपारनंतर वरुणराजाचा जोर कसा राहतो यावर पुढील परिस्थिती अवलंबून असल्याचं म्हटलं जातं आहे.

मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी पाणी तुंबलं नाही तर फक्त ‘साचलं’ आहे