मुंबई : मुंबईत दोन तीन दिवसापासून बरसणाऱ्या पावसाने शहरातील जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबईकरांचे सुद्धा नागपूरकरांसारखे हाल होऊ शकतात. मुंबईमधील जागोजागो तुंबणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहिल्यास या शहरातील पायाभूत सुविधांची बांधणी करताना महापालिका प्रशासन ‘इंजिनियरिंग’ दृष्टिकोनातून विचार करून पायाभूत सुविधांची बांधणी करते का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मुंबईतील अनेक भाग जलमय झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडून रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. परिणामी मुंबईची लाइफलाइन समजणारी लोकल अर्धा तास उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांची हाल होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईतही काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
एकूणच काही दिवसांपूर्वी नागपूरच्या पायाभूत सुविधांचा पावसाने पंचनामा केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली होती. परंतु मूळ समस्यांचे निराकरण करण्याऐवजी सत्ताधारी भाजप – शिवसेना एकमेकांवर कुरघोड्या करण्यात धन्यता मनात आहेत. स्वतः जवाबदारी स्वीकारण्याऐवजी ती झटकण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर अचानक वाढल्यास आणि निसर्गचक्र जोरात फिरल्यास शिवसेनेची सुद्धा नाचक्की होऊ शकते असं दृश्य पावसामुळे तयार होऊ लागलं आहे.
