मुंबई: भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, ‘राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले. या बरोबरच ‘देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत प्रचाराचा नारळ फोडला. कलम ३७० आणि ३५ए वरून शाह यांनी शरद पवारांसह विरोधकांवर हल्लाबोल केला. “ही शिवछत्रपतींची भूमी आहे. स्वराज्याचं निर्माण इथूनं झाली. मुघलांशी लढाई येथूनच सुरू झाली. त्यामुळे कलम ३७० आणि ३५ ए विरोधात भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून द्यावी,” असे आवाहन शाह यांनी यावेळी केले.
अमित शाहांनी आपल्या भाषणात, “कुछ भी हो, कुछ भी न हो, जीत हमारी पक्की है” असं बोलत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. राज्यातील विधानसभा निवडणूकही भाजपसाठी कलम ३७० चा मुद्दा महत्त्वाचा असेल, असं दिसून येत आहे. कारण नाशिकमधील सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कलम ३७० चा मुद्दा लावून धरला होता. कलम ३७० च्या मुद्द्यावरुन अमित शाहांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
अमित शहा म्हणाले की, ”काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमूक झाले तर आम्ही जिंकू, तमूक नाही झाले तर आम्ही जिंकू, असे गणित मांडत आहे. काहीही झाले तरी भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुमतासह भाजपाचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्रात एनडीएला तीन चतुर्थांश बहुमत मिळेल.”
