मुंबई : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

पोलिसांच्या या भूमिकेनंतर मनसे नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही, मात्र आम्ही एक मोर्चा काढल्याने लगेच कसा प्रश्न तयार होतो?’ असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. दरम्यान, त्यामुळे मनसेच्या या महामोर्चाआधी वातावरण चांगलंच ढवळून निघत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीला काही कार्यकर्त्यांची धरपकडही होण्याची शक्यता आहे.

‘चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल,’ अशा नोटीसा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम १४३,१४४ आणि १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत. एकूणच मनसेचा मागील इतिहास पाहता सर्वात शिस्तप्रिय मोर्चे काढण्याचा मनसे सर्वश्रुत आहे. मात्र विषय धार्मिक तेढ निर्माण होण्याचा असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे.

काळेवाडी, रामटेकडी आणि परळगाव येथे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मनसेच्या महामोर्चानिमित्त चौकसभा घेतल्या जाणार आहेत. या आयोजित केलेल्या चौकसभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार किंवा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा शक्यता नाकारता येत नाही. शांतात भंग होऊन कायदा व शांततेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरून आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद केलेली नोटीस धाडण्यात आली आहे. तसेच दादर परिसरात रविवारच्या मोर्चासाठी मनसेची शहारनिहाय जय्यत तयारी सुरु केली असून टेम्पोवर स्पीकर लावून प्रचार सुरु केला आहे.

 

Web Title:  MNS Leader criticized Thackeray Government over action taking against Morcha.

रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही पण आम्ही…संदीप देशपांडेची टीका