मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन छेडलं आहे. एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या २५० विद्यार्थ्यांचं भविष्य सध्या सरकारच्या गलथान कारभारामुळे अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल रोखठोक अजित पवार यांनी प्रसार माध्यमांकडे उपस्थित केला आहे.
या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यानंतर अजित पवारांनी विद्यार्थ्यांच्याा शिष्टमंडळासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची भेट घेतली व हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याची विनंती केली. पुढे अजित पवार म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असूनही असं होणं, हे सरकारचं अपयश आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच संबंधित विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार हा या विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकीचा ठरतो का? असे ते म्हणाले.
मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन छेडलंय. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा ७वा दिवस आहे. जर मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा देखील इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय.
