मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार याची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येत आहे. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं वाहिलं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनातच अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार असल्याचं समजतं आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशात दोनच दिवसांआधी मनसे आपला झेंडा बदलणार असल्याचं समोर आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची परळ मधील रहिवासी इमारतीमध्ये भेट घेतली होती. त्यामुळे मनसेच्या गोटात मोठ्या हालचाली नक्की सुरु आहेत असं बोलायला वाव आहे.

स्वतः राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष असल्याने अमित ठाकरेंना पक्षात एखादं मोठं पद देणं सहज शक्य होतं. मात्र, स्वतःची राजकारणातील जडणघडण लक्षात असलेल्या राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंवर तोच प्रयोग करण्यास सुरुवात केली, जो त्यांनी कमी वयात बाळासाहेब ठाकरेंसोबत अनुभवलेला. त्यामुळे मागील ७-८ वर्षांपासून राज ठाकरे नेहमी अमित ठाकरेंना स्वतःसोबत घेऊन अप्रत्यक्ष मार्गदर्शनच करत होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या तरुणपणीच्या राजकारणचा काळ बदलला असून, त्याची जागा सध्याच्या कॉर्पोरेट राजकारणाने आणि पक्षीय तत्व-मूल्य यांच्या पलीकडील राजकारणाने घेतली आहे. आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या वयात १-२ वर्षाचाच फरक आहे. मात्र, आज आदित्य ठाकरे यांनी मोठी मजल मारली आहे हे वास्तव आहे. आदित्य ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राजकारणात आणण्यात आलं आणि त्याला दुसरं कारण ज्याची जास्त चर्चा झाली नाही आणि ते म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंचं देखील बायपास सर्जरीनंतर काहीसं आजारी असणं. त्यामुळे आदित्य ठाकरे कोणत्याही अंगाने आणि विशेष करून राजकीय दृष्ट्या त्यावेळी परिपक्व झालेले नसताना आणि लोकं स्वीकारतील की नाही याचा जास्त विचार न करता, आदित्य ठाकरे यांना युवासेना अध्यक्ष करून पूर्णवेळ राजकारणात सक्रिय करण्याचा मोठा धोका उद्धव ठाकरेंनी पत्करला. धोका यासाठीच म्हणावं कारण, बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात कोणतही साम्य नव्हतं. मात्र आदित्य ठाकरे यांना जसे आहेत तसे कार्यकर्त्यांसमोर आणि लोकांसमोर आणण्यात आलं.

मात्र, असं सर्व असताना देखील उद्धव ठाकरेंनी तो धोका पत्करला आणि आदित्य ठाकरेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि जे अपेक्षित होतं तेच आदित्य ठाकरेंना देखील सहन करावं लागलं. सुरुवातीला अनेक ठिकाणी त्यांची खिल्ली उडवणं आणि थट्टा करणं सुरु झालं. त्यासाठी अनुभव येईपर्यंत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत शिवसेनेतील अनुभवींची कुमक देखील दिली. या संपूर्ण प्रवासात आदित्य ठाकरे चुकले, हिनवले गेले आणि प्रसार माध्यमांना सामोरे जाताना अनेकदा अडखळले देखील.

मात्र प्रख्यात अर्थतज्ञ ऍडम स्मिथ यांनी म्हटल्या प्रमाणे ‘विदाउट टेकिंग रिस्क प्रॉफिट इज इम्पॉसिबल’ अर्थात धोके पत्करल्याशिवाय आयुष्यात नफा होणं अशक्य आहे. ऍडम स्मिथचा तोच मंत्र उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असंच म्हणावं लागेल. कारण, तेच धोके पत्करल्याने आज आदित्य ठाकरे अपमान पचवायला शिकले, प्रसार माध्यमांना तोंड देणं शिकले आणि महत्वाचं म्हणजे समाजातील विविध स्थरातील लोकांशी संवाद साधायला लागले आणि आज जे आहे ते डोळ्यासमोर. सध्याची त्यांची वाटचाल म्हणजे संपूर्ण शिवसेनेचा ताबा आणि प्रशासकीय ज्ञान घेणं दिसतो आणि त्यांना मंत्रालयात ती संधी स्वतःच्या उपस्थितीतच आदित्य ठाकरेंना देणं शक्य असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा धोका देखील पत्करला आहे. सेक्युलर राजकरणाला सुरुवात हा केवळ उद्धव ठाकरेंचा नव्हे तर आदित्य ठाकरेंचा देखील निर्णय असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे भविष्यात शिवसेना कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकते आणि स्वतःला सर्वच राजकीय स्थितीत टिकवून ठेवेल असाच हा प्रवास आहे.

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या बाबतीत जे धोके पत्करले ते धोके मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी न स्वीकारता अमित ठाकरेंना ‘मिस्टर परफेक्ट’ होण्यासाठी प्रचंड वेळ दिला खरा, परंतु त्यांना खुल्या चर्चेतील सहभाग, मुलाखती आणि प्रसार माध्यमांना पक्षीय धोरणांवर द्याव्या लागणाऱ्या प्रतिक्रियांपासून दूर ठेवणं पसंत केलं. परिणामी आदित्य ठाकरे यांनी राजकीय धोके पत्करत गाठलेली आजची राजकीय सीमा त्यांना गाठता आलेली नाही. अर्थात वेळ आजही गेलेली नाही, परंतु सर्व बाजूने कार्यरत होण्याची वेळ तर नक्कीच आली आहे. मात्र, त्यांच्यासोबत कायम मनसेतील त्याच जुन्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा देण्याची चूक मनसेने न केलेलीच बरी, असं अनेकांना वाटतं. अमित ठाकरेंसोबत नव्या जोमाची, आधुनिक राजकारण समजणारी आणि तंत्रज्ञानात माहीर असलेल्या लोकांची टीम असणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच अमित ठाकरे यांना केंद्रित करून मनसेला समाज उपयोगी निगडित असे काही विषय हाती घ्यावे लागतील आणि त्यासाठी त्यांच्यासोबत नव्या जोमाचा ‘थिंक टॅंक’ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या चर्चेप्रमाणे केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर तो झुगार खेळल्यास भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

अमित ठाकरे यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतः राज ठाकरे आणि केव्हाही रस्त्यावर उतरण्यास तयार असणारी कार्यकर्त्यांची फौज. मात्र, आजच्या राजकरणात टिकण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी तेवढ्याच गोष्टी पुरेशा नाहीत, कारण त्या दोन गोष्टी यापूर्वी देखील पक्षात होत्या. लवकरात लवकर अमित ठाकरे यांना खुल्या मनाने प्रसार माध्यमांसमोर तसेच खुल्या चर्चेत सहभागी होऊ देणं गरजेचं आहे. कदाचित ते चुकतील किंवा अडखळतील देखील, मात्र कालांतराने तेच त्यांना राजकीय दृष्ट्या परिपक्व आणि कणखर बनवेल. समाज माध्यमांमुळे टीका टिपणी होणार हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे, कारण समाज माध्यमांवर थोर विचारवंत असो किंवा सामान्य माणूस, प्रत्येकाची किंमत एकच असते हे वास्तव आहे आणि त्यामुळे स्वतःला वेगळं करून चालणार नाही.

त्यात अमित ठाकरे देखील राज ठाकरे यांच्याप्रमाणे तंत्रज्ञान या विषयापासून चार हात लांब राहणं पसंत करत असल्याने, त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात मनसेमध्ये ‘थिंक टॅंक’ हा प्रकारचं नसल्याने, भाजपने २०१४ नंतर तंत्रज्ञानाच्या आधारे जे साध्य केलं, त्याबाबत मनसे अजून अंधारातच आहे आणि त्याचं कोणाला काही पडलेलंच नाही असं एकूण चित्र आहे. पक्षात ‘थिंक टॅंक’ नसल्यानेच दर निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका घेण्याची वेळ पक्षावर येतं आहे, ती आज थेट पक्षाची ध्येय धोरणं बदलण्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, अमित ठाकरेंच्या प्रवेशापूर्वी मनसेने त्या पारंपरिक विषयांना छेद देणं गरजेचं आहे, अन्यथा भिविष्यात काहीच वेगळं हाताला लागणार नाही, असं तज्ज्ञांना वाटतं. कारण, आजही अनेक राज्यस्तरीय पक्ष भाजपाला पराभूत करत आहेत आणि ते केवळ ‘थिंक टॅंक’ टीमच्या आधारे एवढाच त्याचा थोडक्यात निष्कर्ष काढता येईल.

 

Web Title:  Political launching of Amit Thackeray will be Next Big step of MNS Chief Raj Thackeray.

अमित ठाकरेंचा खऱ्या अर्थाने सक्रिय राजकारणातील प्रवेश आणि भविष्यातील आव्हाने: सविस्तर वृत्त