मुंबई: नाणारचं झालं तेच आरेचं होणार असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला आहे. उद्धव यांनी आज आरेतील वृक्षतोडीवरून भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे, त्यामुळे आगामी काळात आरे कारशेडवरून शिवसेना-भाजपा दरम्यान जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जाहीरपणे विरोध केला आहे. नाणार प्रकल्पाचाही असाच आग्रह धरण्यात आला होता. त्याचं काय झालं तुम्हाला माहीत आहे. जे नाणारचं झालं, तेच आरेचं होणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला.

दरम्यान, काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द करण्याबाबत जसा धाडसी निर्णय सरकारने घेतला अगदी तसाच धाडसी निर्णय राम मंदिराच्या निर्मितीबाबत मोदी सरकारने घेतला पाहिजे. राम मंदिराबाबत विशेष कायदा करुन सरकारने हा निर्णय घ्यावा. आता आणखी वेळ घालवू नये आम्ही खूप वेळ वाट पाहिली आहे” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्यादिवसापासून आग्रही आहे. बाबरी पाडली त्यावेळी देखील संपूर्ण देशात शिवसेनाप्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. ९२ पासून हा विषय सुरू आहे. आणखी आम्ही किती वर्ष थांबायचं?’ असा सवाल त्यांनी यावेळी केला. ‘कोर्टात हा विषय अंतिम टप्प्यात आला आहे असं ऐकतो आहोत. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो द्यावा’, अशा शब्दांत त्यांनी विनंती केली.

जे नाणारचं झालं तेच आरेचं होणार; उद्धव ठाकरेंचा वृक्षतोडीला विरोध