मुंबई: केंद्रात सक्रीय असणारी एखादी व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते असं सूचक वक्तव्य एनसीपी’चे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एनसीपी’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत.’ अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यानच अजित पवारांना एक एसएमएस पाठवून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे.
Ajit Pawar, Nationalist Congress Party: I received a message from Sanjay Raut a while ago, I was in a meeting so couldn’t respond. This is the first time after elections that he has contacted me, I don’t know why he has messaged me. I will call him in a while. #Maharashtra pic.twitter.com/HAjKqBlsY3
— ANI (@ANI) November 3, 2019
”निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी आम्ही बोलेलो नाही, परंतु आता एनसीपी’ची बैठक सुरू असताना संजय राऊत यांचा मला मेसेज आला आहे. निवडणूक झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांचा मला मेसेज आलेला आहे. मी त्यांना आता फोन करून याबद्दल विचारेल” असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच, शरद पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी याची सुताराम देखील शक्यता नसल्याचेही स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्ष, शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणार का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही महाआघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढलो. महाआघाडीत एनसीपी, काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व पक्षांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी सांगितलं.
