पुणे: पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ९ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
Maharashtra: Five dead after a wall collapsed due to heavy rains in Sahakar Nagar, Pune. More details awaited.
— ANI (@ANI) September 25, 2019
परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुण्यात मुक्काम ठोकला आहे. शहरात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला. पावसाची संततधार कायम राहिल्याने शहरातील अनेक भागात पाणी तुंबायला सुरूवात झाली. मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर रस्त्यांना ओढ्या-नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले.
मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सहकार नगर मधील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनी येथील भिंत कोसळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील सोसायट्या, घरे आणि वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
Horrible rains near Sinhagad campus, Vadgaon #punerains pic.twitter.com/trKdtmvZIG
— Kishor Sonawane (@GoldeN3east) September 25, 2019
शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील ५ तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
