नाशिकः नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली असून शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युतीला झटका बसला आहे.
नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचं सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि ३५ नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचं सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना लाखाहून आधिक मताधिक्य याच मतदार संघातून मिळाले होते. तरीही या मतदारसंघाची जागा शिवसेनेला न देता आमदार सीमा हिरे भाजपाच्या असल्याने त्यांना सोडण्यात आली. त्यामुळे येथील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एकत्र येत विलास शिंदे यांना रिंगणात उतरविले आहे. मात्र, बंडखोरांची नाराजी दूर करत दोन्ही पक्षांकडून युतीधर्म पाळावा, असे आवाहन करण्यात आला. तरीही या मतदारसंघात शिवसेनेकडून बंड कायम करण्यात आला होता.
या बंडामुळे सीमा हिरे यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करूनही बंडखोरांवर काहीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, शिवसेनेकडून कारवाई होण्याआधीच या मतदारसंघातील ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी आपले राजीनामे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
