मुंबई : मुंबईतील आणि गिरगावातील गणेश मंडळांसाठी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आखाड्यात उतरले असून, त्यांनी गणेश मंडळांच्या व्यथा आणि प्रश्न घेऊन थेट मुख्यमंत्री निवास गाठलं आहे. अमित ठाकरे यांच्या बरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवास्थानी भेट घेतली आहे.
मुंबई महापालिकेने गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी गणेश मंडळांना आधीच परवानगी नाकारली असून त्यांना गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी जी पूर्व तयारी लागते त्यात प्रचंड अडथळे येत आहेत. याआधी गिरगावच्या गणेश मंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज’वर भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः गिरगावला भेट दिली होती आणि बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा, दरवेळी आमचे सण आले की बंधनांच्या गोष्टी कशा काय सुरू होतात? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर आज राज्य सरकारच्या दरबारी सुद्धा अमित ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या अडचणींचे आणि महापालिकेच्या नियमांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. या बैठकीत गणेश मंडळांना महत्वाची परवानगी मिळताना होणारा त्रास आणि गणपतीच्या मिरवणुकींचा बदललेला मार्ग याविषयी चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
अमित ठाकरे आणि देवेन्द्र फडणवीस यांच्या मध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसे सरचिटनीस संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं तसेच या विषयावर येत्या दोन-तीन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अमित ठाकरे यांना दिल्याचे समजते. काही दिवसांपासून अमित ठाकरे सक्रिय राजकारणात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत असून पक्षाच्या दैनंदिन दौऱ्यांसोबतच ते विभाग निहाय मेळाव्यात तसेच राज्यातील लहान मोठ्या पक्षीय कार्यक्रमात सुद्धा सहभागी होत असून, त्यांच्याकडे दिवसेंदिवस तरुणाचा ओढा वाढताना दिसत आहे.
