मुज्जफरपूर : देशसेवेसाठी तयार होण्यासाठी सैनिकांना ६ ते ७ महिने लागतात. परंतु देशाला गरज पडली तर आरएसएस स्वयंसेवक ३ दिवसात सज्ज होतील असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.

रविवारी बिहार मधील मुज्जफरपूर येथील आयोजित संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. आरएसएस ही काही लष्करी संघटना नाही. परंतु देशाला गरज पडल्यास आम्ही भारतीय लष्कराच्या आधी तयार होऊ असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

पुढे उपस्थितांना संबोधित करताना ते असे ही म्हणाले की आमचे स्वयंसेवक नेहमीच देशाच्या रक्षणासाठी सज्ज असतात आणि ते हसत हसत देशासाठी बलिदान देऊ शकतात. जेव्हा चिनी सैन्य भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत होते तेव्हा आमचे स्वयंसेवक सीमेवर लष्कर येईपर्यंत उभे होते. त्यावेळी आरएसएस ने असेही ठरवले होते की जर चिनी सैन्य आलेच तर प्रतिउत्तरादाखल आपणही जोरदार हल्ला करायचा. स्वयंसेवक दिलेली जवाबदारी नेहमीच चोख बजावतात असा दावाही मोहन भागवत यांनी केला.

सरसंघचालकांच्या या विधानानंतर ‘आम आदमी पार्टी’ ने प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर असे विधान वादग्रस्त विधान इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने केले असते तर भाजपच्या लोकांनी त्याला पाकिस्तानला धाडलं असतं. तर मीडियाने थेट फाशीच्या शिक्षेची मागणी केली असती. पण आता हा विषय सरसंघचालक मोहन भागवत यांचा आहे.

Army needs months to prepare for battle but RSS needs only a three days said Mohan Bhagwat