नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला हादरा बसला असून पक्षातील तब्बल आठ आमदारांनी नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून भाजपाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांमध्ये दोन मंत्र्यांचा देखील समावेश आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून या राज्यात विधानसभेच्या एकूण साथ जागा आहेत. ११ एप्रिल रोजी या राज्यात मतदान होणार असून भाजपाचे पेमा खांडू हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नुकतीच ५४ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आठ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेश व अन्य राज्यात एनपीपी आणि भाजपाची युती आहे.
अरुणाचलमधील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष जारपूम गामलिन, गृहमंत्री कुमार वाय, पर्यटन मंत्री जारकर गामलिन या प्रमुख नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपाचे विद्यमान ८ आमदार आणि १२ पदाधिकारी असे एकूण वीस जण एनपीपीत सामील झाले आहे. भाजपाने निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांना उमेदवारी नाकारली. आता आम्ही जिंकण्यासाठीच निवडणूक लढवू, असा सूचक इशाराही या नेत्यांनी भाजपाला दिला आहे.
अरुणाचल प्रदेशनंतर त्रिपुरा येथेही भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी भाजपाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपाचे त्रिपुरा येथील उपाध्यक्ष सुबल भौमिक, प्रकाश दास, देवशिष सेन यांनी भाजपाला रामराम केला आहे.
