मुंबई : भाजपने ‘मिशन २०१९’ची जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबईत आधुनिक टेक्नोलॉजीने सज्ज अशी ‘वॉररूम’ सुरू करण्यात आली आहे. याच ‘वॉररूम’मध्ये निवडणुकीची रणनिती आखली जाणार असून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.

२०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मुंबईतील सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी निवडणूक वॉर रुम बनवली असून तिथे रणनिती आखली जाणार आहे. प्रचाराचा प्लान आखताना टेक्नोलॉजीचा वापर करण्याबरोबरच बूथ लेव्हल कार्यकर्त्यांंचा क्षमते प्रमाणे वापर केला जाणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही वॉर रुम बनवली असून इथे असणारे तंत्रज्ञ आखलेल्या योजनेची अंमलबजावणी होत आहे की नाही त्यावर ते स्वत: लक्ष ठेवणार आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २०१४ सारखी ‘मोदी लाट’ नसेल, ही बाब ध्यानात घेऊनच निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा बूथ स्तराच्या प्रचारावर विशेष भर असतो. त्यामुळे त्याच दृष्टीने भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांची फळी प्रचारासाठी तयार करण्यात येणार आहे. नियोजन आणि शिस्तीवर या रणनितीत भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या धर्तीवर विस्तारकांची एक टीम तयार केली जाणार आहे. या टीमचे निवडणुकीच्या तयारीवर बारीक लक्ष असेल.

Bjp have set war room at Mumbai for Mission 2019