मुंबई : मुंबईतील गणेश मंडळांवर मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारणीसाठी मान्यता घेतली नसल्याचा बडगा उगारला असून थेट मंडप रिकामी करण्याचे आदेश गणेश मंडळांना देण्यात येत आहेत. दरम्यान, कारवाई करताना महापालिकेचे उपस्थित वकील आणि अधिकारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाच मंडप उतरविण्यास सांगत असून, तसे न केल्यास कायदेशीर कारवाईच्या सूचना देत आहेत.
मुंबईतील मुलुंड पश्चिमेला दीनदयाळ उपाध्याय मार्गावर सर्वप्रथम हा बडगा महापालिकेकडून उगारण्यात आला आहे. दरम्यान, कायदेशीर कारवाई होण्याच्या भीतीने मंडळाचे पदाधिकारी सुद्धा भेदरले असून यांनी मंडप खाली करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मंडप उतरविण्यासोबतच तो खाली मंडप बाहेरून दिसू नये म्हणून स्थानिकांना थेट गणपतीचे विर्सजन करून या असे दम सुद्धा दिले जात आहेत. त्यात मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला एकही गणपती मंडप अनधिकृत नसल्याचे कळवले होते तर मग या कारवाई मागचे कारण तरी काय, असा प्रश्न गणेश मंडळ आणि स्थानिक उपस्थित करत आहेत.
त्यामुळे लवकरच यावर तोडगा न निघाल्यास परिस्थिती चिघळू शकते असं ऐकूनच वातावरण संबंधित ठिकाणी दिसत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आणि सत्ताधारी शिवसेनेविरुद्ध या कारवाईमुळे स्थानिक रोष व्यक्त करत आहेत. सध्या न्यायालयाच्या बडग्याने राजकारणी मंडळी सुद्धा या विषयावरून स्वतःला दूर लोटत आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि गणेश मंडळांमध्ये चिंतेचं वातावरण दिसत आहे.
