मुंबई : मराठा समाजाने हिंसा वा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
तसेच मागील काही दिवसांपासून होणारी मराठा समाजाची आंदोलने, आत्महत्या व आत्महत्येचे प्रयत्नं या सर्व बाबी आमच्यासाठी अतिशय दु:खद आहेत, असे नमूद करताना काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. विविध योजना किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. तसेच राज्यातील मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा योग्य निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता महाराष्ट्र शासनाशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्र्यांनी या लेखी निवेदनात नमूद केले.
