नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्याच्या एकूणच प्रतिक्रिया पाहिल्यास, ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार असं सांगत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीत भरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली आणि जर राष्ट्रवादी महाराष्ट्रात सोबत आली नाही तर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असता मल्लिकार्जून खरगे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी निवडणूकपूर्व महाआघाडी होण्याची शक्यता फेटाळली होती आणि त्यामुळे राज्यातील व दिल्लीतील काँग्रेसच्या गोटात संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीला राज्यातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, एकनाथ गायकवाड, हर्षवर्धन पाटील, रजनी पाटील, संजय निरुपम, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, राजीव सातव हे काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते.
शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय आधीच घेतला असला तरी महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाचे सरकार येण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे शिवसेना भविष्यात या निर्णयावर किती ठाम राहील हे सांगण कठीण आहे. तसेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला सत्तेपासून खाली खेचायचे असल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणे महत्वाचे असले, तरी सध्या पवारांच्या मागील काही भूमिकांमुळे दोन्ही पक्षांमध्ये आणि विशेष करून काँग्रेसमध्ये संभ्रमाची अवस्था आहे.
दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्ष पूर्णपणे सुस्त असल्याचं वातावरण असून त्यांना राज्य स्तरावरील चेहराच नसल्याने कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत. राज्यातील मागील काही नगरपालिका, लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुका तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचा अंदाज घेतल्यास यात काँग्रेस जवळपास कुठेच नसल्याचं चित्र असल्याने कारकर्त्यांना कोणताही कार्यक्रम नसल्याचे एकूणच वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील सुस्त काँग्रेसमुळे त्याचे परिणाम राष्ट्रवादीला सुद्धा भोगावे लागू शकतात असं वातावरण आहे. त्यात मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बद्दल काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी नाही.
विशेष म्हणजे मनसे सारखा छोटा पक्ष सुद्धा सर्व वर्तनामपत्र तसेच वृत्त वाहिन्यांनी व्यापून गेला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे संधी मिळताच मोदी सरकारवर तुटून पडताना दिसत आहेत. परंतु काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष मात्र महाराष्ट्रात हरवल्याचे चित्र आहे. त्यात जर भविष्यात हातात असलेले विद्यमान आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले तर काँग्रेससाठी राज्यातील परिस्थिती फारच कठीण होईल असं चित्र आहे.
