छत्तीसगड : छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप तसेच मोदींवर तुफान टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शनिवारी सरगुजा येथे आयोजित एका रॅलीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट मोदींनी राफेल करारावर केवळ १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी असं खुलं आव्हान दिलं. त्यांनी केवळ १५ मिनिटं माझ्याबरोबर राफेलच्या विषयावर बोलू द्यावं आणि त्यानंतर तेवढ्याच वेळ स्वतः सुद्धा त्याविषयी बोलावं असं राहुल गांधी म्हणाले. राफेल लढाऊ विमानांच्या कराराद्वारे मोदींनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला तब्बल ३०,००० कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

काल राहुल गांधी यांची छत्तीसगड येथे शेवटची प्रचारसभा पार पडली. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नोटाबंदी, कर्ज बुडवणारे उद्योजक अशा विषयांवरून मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा करुन लोकांच्या अडचणी वाढवल्या. परंतु, श्रीमंत उद्योजकांना त्यांनी मोठा दिलासा दिला. मोदींनी श्रीमंत उद्योगपतींचे तब्बल ३. ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. परंतु, गरीब शेतकऱ्यांचे कोणतेही कर्ज त्यांनी माफ केले नाही, असा घणाघात केला.

छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर केवळ १० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे काँग्रेस अध्यक्षांनी जाहीर केले. तसेच कर्जमाफीसाठी पैसे कुठून आणणार, याचे उत्तर सुद्धा उपस्थितांना दिले. ‘पंतप्रधान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा लोकांकडून आम्ही पैसे वसूल करु आणि गरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितले.

congress president challenges pm narendra modi for debate on rafale deal