नवी दिल्ली: जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आम्ही पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा थेट इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. केवळ घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज सुद्धा माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना म्हणाले.

आजच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी कामकाजात सहभागी होण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कालच काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी संपन्न झाले. यानंतर नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली.

त्याच मुद्याला अनुसरून काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘काल काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला आम्हाला ६ तासदेखील लागले नाहीत. मात्र मोदी साडेचार वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी या काळात देशातील शेतकऱ्यांचं एक रुपयाचंही कर्ज अजून माफ केलेलं नाही,’ अशा कडक शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.

पुढे ते असं म्हणाले की, ‘मोदींनी देशाला २ भागांमध्ये विभागलं आहे. यातील एका भागात फक्त १५ जण आहेत. यामध्ये मोदींचे लाडके उद्योगपती आहेत. त्यांची मोठं मोठी कर्ज ते लगेच माफ करतात. मात्र दुसऱ्या भारतात असलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडून काही मिळत नाही. परंतु, यापुढे जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मोदींना झोपू देणार नाही,’ असा थेट इशारा राहुल यांनी मोदींना दिला आहे.

congress president rahul gandhi slams pm narendra modi over farmers loan waiver