इंदापूर : जो स्वतः संसार करत नाही, मग अशा माणसाला महागाई काय समजणार अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे आणि जो स्वतः संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काही काम नसते असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांना हसू आवारता आलं नाही.
नरेंद्र मोदी साहेब देशाला न्याय देऊच शकत नाहीत. केवळ संसारी माणसूच सामान्यांना न्याय देऊ शकतो. ज्याने स्वतः संसार केला नाही. त्याला काय समजणार महागाई असा संदर्भ सुद्धा त्यांनी जोडला. इंदापूर येथे पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात ते उपस्थितांसमोर बोलत होते. सामान्यांना घरी गेल्यावर गॅस वाढला, पैसे संपले, महिन्याचे खर्चाचे पैसे केवळ वीस दिवसांत संपले, पेट्रोलचे दर वाढले, असं सर्व ऐकून घ्यावे लागते, असे अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
उपस्थितांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या बाबतीत तसे नाही. ते म्हणजे एकटा जीव सदाशिव आहेत. त्यांना घरी कोणी सांगायलाच नाही. त्यामुळे घरी गेले की निवांत झोपायचे. अशा गोष्टींची चर्चा होत नसल्यामुळे याची झळ बसायचा प्रश्नच नाही. आपली अवस्था मात्र पांडू हवालदार, सोंगाड्यासारखी झाल्याचे त्यांनी म्हटले.
