नवी दिल्ली :  आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार नाही. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’ नावाने एक सर्व्हे केला आहे. साडे चार वर्षांनंतर युपीए आघाडीला दुपटीने जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला ५५ जागांचं नुकसान होताना दिसत आहे.

दुसऱ्या राजकीय परिस्थितीनुसार, जर काँग्रेसप्रणीत युपीएने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेसला सोबत घेतलं तर एनडीएची मतदान टक्केवारी कमी होणार नाही मात्र जागा कमी होऊन २२८ होऊ शकतात. याचा अर्थ एनडीएला एकूण १०८ जागांचं नुकसान होऊ शकतं. तर युपीएच्या जागा वाढून २२४ होऊ शकतात. सोबतच मतदान टक्केवारी वाढून ४१ टक्के होऊ शकते, म्हणजे युपीएला १६४ जागांचा फायदा होऊ शकतो. इतरांच्या खात्यात ९२ जागा आणि २३ टक्के मतं जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे एनडीए आणि युपीएमध्ये फक्त चार जागांचं अंतर राहत आहे. त्यामुळे लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तिसरी राजकीय परिस्थिती दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांच्या युतीवर आधारित आहे. सर्व्हेत सांगितल्यानुसार, जर एनडीएने तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमूक आणि आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसला सोबत घेतलं आणि काँग्रेसने टीडीपी आणि जम्मू काश्मीरमधील पीडीपीला सोबत घेतलं तर एनडीएचा जागांचा आकडा २५५ पर्यंत पोहोचू शकतो. तसंच मतदान टक्केवारी ४१ टक्के होऊ शकते. अशा परिस्थितीत युपीएला २४२ जागा आणि ४३ टक्के मतं मिळू शकतात. इतरांना ४६ जागा आणि १६ टक्के मतं मिळू शकतात. अशा परिस्थितीतही लोकसभेत त्रिशंकू होईल.

Election servery by India Today on loksabha election