नवी दिल्ली : आगामी निवडणुकीच्या तोंडावर देशात धार्मिक तेढ वाढविण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न सुरु झाले आहेत का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. कारण हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेने ‘२५ नोव्हेंबरला चलो अयोध्या’ चा कार्यक्रम आखला आहे आणि त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा म्हणजे २५ नोव्हेंबरला राम मंदिराच्या मागणीसाठी प्रचंड सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या मुद्यावर नापास झालेला शिवसेना पक्ष आणि भाजपच्या जातीयवादी धोरणांचा भाग असलेल्या आरएसएस’ने मतदारांचे मन संपूर्णपणे धार्मिक मुद्यांवर वर्ग करण्यासाठी रणनीती आखल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. राम मंदीराच्या नावाने श्रेयवादाची लढाई सुरू करून देशात तेढ वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत का असा प्रश्न अनेक तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे हिंदुत्व तसेच राम मंदिराच्या मागणीसाठीचे आंदोलन उभे करण्याचे सूतोवाच आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपापल्या संघटनेच्या दसरा मेळाव्यात म्हणजे एकाच दिवशी दिल्याने हे सर्व ठरवून सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, २०१९ मधील निवडणुकीत भाजपसाठी मोदी लाट नसेल असे संकेत मिळाल्याने आरएसएस’च्या माध्यमातून धार्मिक मुद्दे पुढे केले जातील. तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात ५ वर्ष सत्तेत मंत्रिपदं उबवून शिवसेनेने काय विकास कामं केली याचं उत्तर पक्ष प्रमुखांकडे नसल्याने शिवसेना सुद्धा केवळ “राम मंदिर” आणि धार्मिक विषयांवर भाषणबाजी करून मतदाराला मूर्ख बनविण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवेल यात शंका नाही.
त्यात शिवसेनेचे विदर्भातील आमदार धानोरकर शिवसेनेच्या १२ मंत्र्यांवर आरोप करताना म्हणाले होते की, शिवसेनेच्या राज्यातील १२ मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने देखील जनहिताची कामं केलेली नाहीत. जिल्ह्याची कामं तर सोडा त्या मंत्र्यांनी साधी स्वतःच्या मतदार क्षेत्रातील सुद्धा विकासाची कामं केलेली नाहीत आणि तिथेच शिवसेना सत्ताकाळात विकासाच्या मुद्यांवर नापास झाल्याचं सिद्ध झालं आणि त्यानंतर धार्मिक राजकारणाशिवाय पक्षाकडे दुसरा पर्याय नाही हे सुद्धा सत्य आहे.
