मुंबई : सुरुवातीला समृद्धी मार्गाला तीव्र विरोध करणारी शिवसेना अचानक अशी काय नरमली अशी शंका व्यक्त करताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, “कमिशनचा हिस्सा मिळाल्यामुळेच शिवसेनेचा समृद्धी महामार्गाला असणारा विरोध मावळला काय’, असा सवाल उपस्थित केला आहे.
‘समृद्धी महामार्ग तर हाणून पाडूच, तसेच शेतकऱ्यांची इंचभर सुद्धा जमीन संपादित होऊ देणार नाही’, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. दरम्यान, त्याच शिवसेनेचे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आता, समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी विनंती करणारे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करून आले. संबंधित विषयावर कमिशन मिळाल्यानेच सेनेचा ‘समृद्धी’विरोध मावळला काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, भाजप-शिवसेना सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणाला जवळपास ४ वर्षे विलंब झाला असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कार्यवाही पूर्ण करून ओबीसीसह इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता कोर्टात टिकेल असे १६ टक्के आरक्षण देण्याची जबाबदारी फडणवीस सरकारची आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
