नवी दिल्ली : २०१६ मध्ये काळापैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने अचानक पुकारलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आता २ वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. परंतु, सदर निर्णयामुळे सर्वसामान्यांना प्रचंड हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या. दरम्यान, जुन्या नोटा जमा करून नव्या नोटा मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना संपूर्ण वेळ उन्हातान्हात सह परिवार उभे राहावे लागले होते. त्यात, अनेकांचा रांगेत मृत्यू झाल्याच्या खूप घटना घडल्या होत्या. परंतु, नोटाबंदीदरम्यान देशात नेमका किती लोकांनाच नाहक जीव गेला याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नोटाबंदीच्या काळात भारतात किती लोकांचे मृत्यू झाले, याबाबतची सविस्तर आकडेवारी माहितीच्या अधिकारांतर्गत पंतप्रधान कार्यालयाकडून मागवण्यात आली होती. परंतु, त्याला उत्तर देताना नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याची माहिती पीएमओकडे नाही, असे पीएमओच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सूचना आयुक्तांसमोर कळवलं आहे. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर अनेक लोकांचे रांगेमध्ये तर काही जणांचा कामावर असताना नाहक मृत्यू झाल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या.
२०१६ मध्ये पुकारण्यात आलेल्या नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत माहिती घेण्यासाठी नीरज शर्मा यांनी पीएमओ कडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता. तसेच त्यांनी मृत्यू झालेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती देखील मागवली होती. मात्र पीएमओकडून निर्धारित ३० दिवसांमध्ये माहिती प्राप्त न झाल्याने त्यांनी केंद्रीय माहिती आयुक्तांकडे धाव घेत पीएमओमधील माहिती अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. तसेच शर्मा यांनी जी माहिती मागवली होती, ती माहितीचा अधिकार कायद्यातील कमल २ (एफ) अंतर्गत माहितीच्या कक्षेत येत नाही, असे सांगितले.
