मुंबई : कालचा पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद आयोजित केल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगू लागली. परंतु त्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या मुद्याला उद्धव ठाकरे यांनी साधा स्पर्श देखील केला नाही.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघर निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात छत्रपती शिवरायांचा जो अपमान झाला, त्या अपमानाबद्दल भाजपने एक अवाक्षरही काढलेले नाही. हीच यांची शिवभक्ती आहे का? उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराजांचा अपमान केला आहे. भाजपच्या शिवभक्तीवर आम्हाला आता संशय येतो आहे. मात्र उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये योगी आदित्यनाथांची मस्ती उतरवली गेली आहे आणि तिथे भाजपचा पराभव झालेला आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांचा अपमानाचा मुद्दा जरी पत्रकार परिषदेत उपस्थित केला असला तरी आपण त्याच छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपसोबत सत्तेत सहभागी आहोत याचा त्यांना विसर पडला होता. पराभवच संपूर्ण खापर निवडणूक आयोगावर फोडण्यात आलं.
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना सत्तेतील सहभागाबद्दल विचारले असता, त्यांनी ते प्रश्न तर टाळलेच व मी आज जे मुद्दे लोकशाहीच्या दृष्टीने उपस्थित करतोय ते महत्वाचे आहे त्याकडे तुम्ही जनतेचे लक्ष वेधा असा सल्लाही उपस्थित पत्रकारांना दिला. पुन्हां त्याच सत्तेतील सहभागावर प्रश्न विचारले जाऊ लागताच पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली. त्यामुळे आता समाज माध्यमांवर तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे की, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपसोबत तुम्ही सत्तेत सहभागी कसे ?
