अयोध्या : येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, अयोध्येला येण्यामागे माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. मी केवळ देशातील तमाम हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे. परंतु, आता मोदी सरकारने तमाम हिंदुंच्या भावनांशी अजिबात खेळू नये. एवढे दिवस, वर्षे आणि पिढी गेली तरी अजून अयोध्येत राम मंदिर उभे राहत नाही. युपीचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीच सांगितल्याप्रमाणे मंदिर येथे होतं, आहे आणि राहिलं सुद्धा या मताशी आम्ही पण सहमत आहोत. परंतु, हे राम मंदिर आम्हाला दिसत का नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

संसदेत राम मंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश आणा, कायदा करा नाहीतर अजून काही करा, परंतु राम मंदिर निर्माण लवकरात लवकर सुरु करा. शिवसेना पक्षाची हिंदुत्वासाठी भाजपाला साथ आहेच. तसेच संविधानाच्या चौकटीत जी प्रत्येक शक्य असणारी गोष्ट आहे, त्याचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन २०१४च्या लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने आपल्या त्यांच्या जाहीरनाम्यात लेखी दिले होते. पण गेल्या चार वर्षात तुम्ही नक्की काय केलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित करून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर मंदिराचा प्रश्न मार्गी लावणे मोदी सरकारला जमत नसेल तर सामान्य जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

मी रामलल्लाच्या दर्शनाला गेल्यामुळे येथे चैतन्याचे वातावरण भासले खरे, परंतु मी रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात चाललो की तुरुंगात हेच कळत नव्हतं, अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी संवाद साधताना व्यक्त केली. केवळ देशात निवडणुकी आधी ‘राम-राम’ आणि त्यानंतर आराम सुरु असल्याची कडवी टीका सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षावर केली.

if ram temple is not to be formed at ayodhya before election then the central government will not be formed says shivsena chief uddhav thackeray