अयोध्या : अयोध्येत राम मंदिर निर्माणाचे काम सुरु करण्यात यावे यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर इतर अनेक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत त्याच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यात स्थानिक व्यापारी वर्गाच्या मनात भितीची भावना निर्माण झाली असून केवळ निवडणुकीच्या राजकारणापायी इथली शांती भंग करण्याचा या संघटनांनी चंग बांधला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
त्यात भर म्हणजे विहिंपने काल मनाई हुकुम झुगारुन लावत रविवारी होणाऱ्या धर्म सभेला पाठिंबा मिळवण्यासाठी अयोध्येमध्ये रोड शो केल्याने तणावात अजूनच भर पडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्येमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आणि राम मंदिर मुद्द्याची संवेदनशीलता लक्षात घेता अयोध्येत सध्या पोलीस छावणीचे रूप आले आहे.
संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकडय़ा सज्ज करण्यात आल्या आहेत. तसेच वादग्रस्त जागेवर सद्य स्थिती कायम रहावी आणि कोणत्याही न्यायालयीन नियमांचे उल्लंघन होऊ नये, असे स्पष्ट आदेश आहेत असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
एकेनच तिथलं तणावाचं वातावरण बघता अनेकांनी आज सुद्धा ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळेच अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विहिंपच्या धर्म सभेला तीव्र विरोध केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
