मुंबई : अनेक दिवसांपासून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चेला उधाण आलं होतं. नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांसह सामान्यांचे देखील लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ ही मनसे लढवणार नाही असं पत्रकं मनसेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र मनसेची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. मनसे निवडणूक लढणार की नाही याबाबत कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेर या प्रश्नाला मनसेकडूनच उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकृतरित्या पत्रक काढत आगामी लोकसभा निवडणूक मनसे लढणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे १९ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीबाबत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला. मनसेला आघाडीत घेतल्यावर त्याचा फटका उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो अशी शक्यता काँग्रेसकडून वर्तवली जात होती. त्यामुळे महाआघाडीत देखील मनसेला स्थान राहिलं नाही.

lok sabha election 2019 mns party will not contest and has clarified it by issuing official letter