ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना सरकारविरोधात विविध विषयांच्या संदर्भात महामोर्चा काढला जाणार आहे. आज दुपारी एकच्या सुमारास तीन हात नाका ते जिल्ह्याधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढला जाणार असे वृत्त आहे.
विद्यमान सरकार दुष्काळ, पाणी टंचाई, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, पालिका क्षेत्रातील शाळा, सार्वजनिक वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, शहरातील अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत फेरीवाले अशा अनेक गंभीर प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ योजनांचे तसेच शहरांचे नामांतरण करण्यात व्यस्त आहे. तसेच फेक न्यूजच्या आड सरकारकडून आश्वासनांचा बाजार मांडत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे.
त्यामुळे झोपलेल्या भाजप आणि शिवसेना सरकारला जाग करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यात महा मोर्चाचे आयोजन केले आहे. काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त असून त्याला मोठा जनसमुदाय आणि कार्यकर्त्यांचा फौजफाटा असेल याची पक्ष तयारी करत आहे. सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करून संपूर्ण शहर दणाणून सोडण्याचा संकल्प मनसेने आखल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण शहरात भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल यात शंका नाही.
दरम्यान, कालच या महा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळणार या भीतीने विरोधकांनी ठाण्यात मनसेचे बॅनर्स फाडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोर्चापूर्वीच विरोधकांचे धाबे दणाणल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
