ठाणे : ठाण्यात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर पत्रकार परिषदेत तुडवून पोलिसांच्या हवाली केले आहे. गुजरातमध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. पण किती दिवस या असल्या लोकांना सहन करायचे ?. जर हे असले विकृत प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू, असा थेट इशाराच मनसेने दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधूनच मुंबईत रोज घाण येते आहे, अशा शब्दात मनसेने उत्तर भारतीयांवर टीका केली.
ठाण्यात एका अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचाराचा किळसवाणा प्रयत्न केला होता. तसेच तो सर्व प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला होता. दरम्यान, स्थानिकांनी नराधमाला चोप दिला, मात्र तिथून हा नराधमाने पळ काढला होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तपास सुरु केला होता. व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून नराधमाचा शोध घेतला जात होता. आज ठाण्यातील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या व्हिडिओतील नराधमाला थेट पत्रकार परिषदेत आणले. हा नराधम मूळचा बिहारचा आहे. त्याने यापूर्वीही ठाण्यात ३ लहान मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, असा दावा सुद्धा अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
अविनाश जाधव आणि मनसेच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतच त्या नराधमाला बेदम तुडवलं. त्याला पत्रकार परिषदेत जाहीर माफी देखील मागायला लावली. ‘नवी मुंबई, मुंबई किंवा ठाणे या तिन्ही शहरांमधील लहान मुलींवर बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी हे उत्तर भारतीय आहेत. हे सत्य असून गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. अशा किती लोकांना आपण सहन करायचे. जर हे प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू. उत्तर भारतातून घाण मुंबईत येत आहे, असे त्यांनी स्पष्ट आरोप त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेनंतर मनसेने त्या विकृत नराधमास ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
