मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विविध प्रश्नां संदर्भात कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे, तरी रहिवाशांचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने अखेर रहिवाशांनी राज ठाकरेंकडे सर्व प्रश्न आज भेट घेऊन मांडले.

बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांच म्हणण ऐकून घेतल्यानंतर सर्वप्रथम म्हाडाने करार केल्याशिवाय घर न सोडायचं नाही असा सल्ला दिला आहे. मुंबईतील नायगाव, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि शिवडी येथे अनेक ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आहेत. या बीडीडी चाळींचा पुनर्विकास टाटा कंपनीकडून करण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाला. त्यामुळे पुनर्विकासाला अडथळा नसला तरी अनेक प्रश्न आजही अनुत्तरित असल्याने रहिवासी संभ्रमात होते.

देशातील अनेक नामांकित बांधकाम व्यवसायिकांनी या निविदा जाहीर होताच त्यात रस दाखवला होता. ज्यामध्ये टाटा प्रोजेक्ट्स, कॅपॅसिट इन्फ्रास्ट्रक्चर सिटिक आणि अरेबियन कन्स्ट्रक्शन तसेच एसीसी इंडिया अशा दिग्गज कंपन्यांची नाव सामील होती. परंतु तब्बल ११,००० कोटीच्या या पुनर्विकास प्रकल्पाची जवाबदारी उच्च न्यायालयाने टाटा कंपनीकडे दिली.

मुंबईतील तीन ठिकाणच्या चाळी सुमारे ८७ एकर’वर पसरलेला हा भूखंड वरळी ५९.६९, ना. म. जोशी १३.९ तसेच नायगाव १३.३९ असा व्यापलेला आहे. या पुनर्वसन प्रकल्पासाठी म्हाडाची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai BDD residence meet MNS Chief Raj Thackeray