श्रीगोंदा : भाजप बरोबर युतीच निर्णय जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत नाराजांची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रत्यय नगर जिल्ह्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीगोंद्यात सेनेला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपली भुमिका जाहीर केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय आनंदकर, बाळासाहेब पवार, राजाराम जठार, शाहू शिपलकर, मोहन भिंताडे, प्रकाश निंभोरे यांच्या उपस्थित होते. शेलार म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
भाजपाच्या विरोधात सेनेचे मावळे मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि युटर्न मारला आहे. त्यामुळे शिवसैनिक गहाळ झाले आहेत. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. राष्ट्रवादीत असताना पाचपुतेंशी तात्वीक मतभेद झाले पण त्यांनी चुका दुरूस्त करुन घेतल्या नाहीत. आमदार राहुल जगताप यांना त्याच्या चुका कळाल्या आहेत. पुढील निर्णय लवकरच सर्वांना सांगू असेही शेलार म्हणाले.
