अहमदनगर : ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा केवळ एका कटाचाच भाग आहे. वास्तविक त्याने सोनियांचे नाव घेतले. परंतु ते कोणी ऐकले आहे? मात्र एका इडीच्या अधिकाऱ्याने ते ऐकले आणि त्याने सर्वांना सांगितले की मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेतले. परंतु, ते खरे आहे की नाही याची कोणालाच काहीच खरी माहिती नाही.
दरम्यान, पुढे पवार म्हणाले की, देशात पहिल्यांदाच सत्तेचा अशाप्रकारे अतिरेक आणि गैरवापर होताना दिसतो आहे. देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये सरकारकडून हस्तक्षेप केला जात आहे. तसेच विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून, देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप यावेळी एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर थेट पत्रकार परिषदेत केला.
अहमदनगर येथे पूर्व नियोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. दरम्यान, पवार पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात प्रथमच सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. अगदी सीबीआयसारखी सर्वोच्च तपास संस्था सुद्धा त्यापासून दूर राहिली नाही. याच तपास यंत्रणेतील क्रमांक एकचे आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांवर अतिशय गंभीर आरोप आहेत. त्या वादानंतर संपूर्ण प्रकरण कोर्टात गेले आहे. नंतर तीच गत आज आरबीआयची झाली आहे. आधीचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मग मोदींनी थेट गुजरातेतून उर्जित पटेल यांना आणले. परंतु, त्यांच्यासोबत सुद्धा यांचे जमले नाही. कारण, रिझर्व्ह बँकेच्या पैशावर यांचा डोळा होता. त्याला उर्जित पटेल यांनी कडाडून विरोध केला. शेवटी त्यांना सुद्धा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. आता सुद्धा त्यांनी हो ला हो बोलणारा त्यांचाच माणूस बसवला आहे. त्यामुळे आपल्या देशांतर्गत संस्था डळमळीत होत आहेत. यापूर्वी देशाच्या इतिहासात असे कधीच झाले नव्हते.
सत्ताधाऱ्यांकडून या देशातील प्रमुख राजकीय, तपास व आर्थिक संस्थांच्या स्वायत्ततेवर हल्ला होऊ लागला आहे. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन न्यायालयीन निवड प्रक्रियेतील गैरवापराबद्दल सांगितलं. सीबीआयमधील प्रमुखांमधले विसंवादही पुढे आले. pic.twitter.com/S37owqAELS
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 30, 2018
विरोधकांना नाउमेद करण्यासाठी सत्तेचा गैरवापर हे मिशेल प्रकरणावरून दिसते. देशासमोर आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला संबंध देशातील लोकशाहीसंबंधी आस्था असलेल्या लोकांनी एकत्र येऊन तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. आणि तो विचार विरोधक म्हणून आम्ही उचलून धरू.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 30, 2018
