मुंबई : सामनातून झालेल्या टीकेतून शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील खूप महत्वाचे नेते आहेत. पण त्यांचे स्मारक तब्बल पाच वर्षे का रेंगाळले? हा माझा प्रश्न काही चुकीचा नव्हता. केवळ स्पष्ट बोलल्यामुळे उद्धव ठाकरेंना कोल्हापुरी मिरची झोंबली, असा सणसणीत टोला अजित पवार यांनी सामनातील अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शिवराळ भाषेत शिवसेनेकडून करण्यात आलेले प्रतिक्रिया म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला.
दरम्यान, स्वतःच्या पहिल्या प्रतिक्रियेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागात बाप असा शब्दप्रयोग केला जातो, तर शहरी भागात वडील असा उल्लेख केला जातो. त्यामुळे माझा शब्दप्रयोग योग्यच आहे. मी केवळ चांगल्या भावनेनेच माझी भूमिका मांडली होती. पण सत्य बोचल्याने उद्धव ठाकरेंना मिरच्या झोंबल्या आहेत. परंतु, शिवसेनेने माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली असली तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. कारण कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत,असे अजित पवार म्हणाले.
