नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी नाशिक ग्रामीणकडे मोर्चा वळवल्याचे निदर्शनास येते आहे. त्यानिमित्त दिंडोरीत त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्याचे समजते. दरम्यान कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कळवणमध्ये भेट घेऊन सर्व अडचणी मांडल्या.

कांद्याला भाव मिळत नाही आणि साधा उत्पनाचा खर्च सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने त्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, राज्यातील मंत्री शेतकऱ्यांच म्हणणं काही ऐकून घेत नसल्याचं त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरे यांनी, जर मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला दिला.

दरम्यान, ग्रामीण भागाकडे राज ठाकरे विशेष लक्ष केंद्रित करत असल्याने तरुणांसोबत शेतकरी वर्ग सुद्धा मनसेकडे आकर्षित होताना दिसत आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नवं चैतन्य संचारलं आहे. त्यामुळे काही दिवसात मनसे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक झालेली दिसेल. मराठवाड्यात सुद्धा मनसेने शेतकऱ्यांसाठी दंडुका मोर्चाचे आयोजन केले होते, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात सुद्धा राज ठाकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय केलेला दिसतो.

Onion producer meet mns chief raj thackeray at Nashik