पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती आणि कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

भारतीय हद्दीद शिरलेल्या ३ पाकिस्तानी लढाऊ विमानांना परतवत असताना १ भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले आणि त्याचे वैमानिक अभिनंदन वर्तमान मात्र यातून बचावले. खाली पडल्यानंतर तिकडे उपस्थित असलेल्या काश्मीर स्वातंत्र्य चळवळीतल्या काही लोकांनी त्यांना लाथा बुक्यांनी मारायला सुरुवात केली. सुदैवाने पाकिस्तान लष्कर वेळेत आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

भारत सरकारने कडक पवित्रा घेत आणि आंतरराष्ट्रीय जिनेव्हा कायद्याची आठवण करून देत अभिनंदन यांना ताबडतोब भारतात पाठवण्याची मागणी केली. अभिनंदन यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वसामान्य स्तरातून लोकांनी मोठा सूर लावला होता आणि पाकिस्तान सरकारने भारतीयांच्या मागणीचा मान म्हणून कोणतीही अट न ठेवता भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांना सोडण्याचा निर्णय घेतला. उद्या सकाळी त्यांना भारतात परत पाठवण्यात येईल असे खात्रीलायक वृत्त आहे.

Pakistan prime minister imran khan issued order to release indian air force commander abhinandan vartaman as soon as possible