मुंबई : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटी मागे सदिच्छा भेट असल्याचे कारण देण्यात असले तरी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने काही चाचपणी सुद्धा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येते.

आमदार बच्चू कडू हे ग्रामीण महाराष्ट्रातील आक्रमक नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. आगामी निवडणुकीत आमदार बच्चू कडू हे महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवेंना थेट आवाहन देण्याच्या तयारीत आहेत.

आगामी निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष वेगवेगळ्या राजकीय चाचपण्या करू शकतात आणि त्याचाच हा एक भाग असावा असं म्हटलं जात. राज ठाकरे आणि बच्चू कडू हे आक्रमक राजकीय नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित असून, आमदार बच्चू कडू हे ग्रामीण भागात सामान्य शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून परिचित आहेत. भविष्यात जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना अशी आक्रमक पक्षांची युती अस्तित्वात आल्यास राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघू शकत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

Prahar Sanghatana chief MLA Bachhu Kadu meet MNS Chief Raj Thackeray at Krushanakunj