भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे असलेल्या एके 47 रायफलचा संदर्भ देत ती यांच्याकडे कशी आली असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच एके ४७ रायफल बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार कोणालाही विनापरवाना शस्त्र बाळगता येत नाही आणि चक्क एके ४७ रायफल सापडल्यामुळे तर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवार्इ केली जाते. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकरांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
आपल्या देशात परवानगी घेऊन पिस्तूल वापरता येते पण देशाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक हत्यारं संघाकडे कशी? तसेच देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायुदल असताना संघाणे प्रतिसेना का उभा करावी? असे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत. संघाच्या लोकांकडे शास्त्रात्रं सापडत आहेत. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांचे एके 47 या रायफलसह फोटोही समोर आले आहेत. यांच्यावर नागपुरात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे आणि आता पोलीस यावर काय कार्यवाही करणार हे पाहावे लागेल.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील अमरज्योत या ठिकाणी शांतता आंदोलन पुकारण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात यावा या मागणीसाठी शांतता आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, संघाकडे असलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल.
