मुंबई : पृथ्वी शॉ’च्या क्रिकेटमधील जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या मदतीचा मोलाचा वाटा आहे. अगदी प्रथम श्रेणी क्रिकेट पासून ते अंडर- १५ आणि अंडर-१९ क्रिकेट पर्यंत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा पृथ्वी शॉ नेहमीच एका मुंबईकरांसारखा महाराष्ट्रात एकजीव झाला होता तसेच तो आणि त्याच संपूर्ण कुटुंब उत्तम मराठी सुद्धा बोलतात हे सर्वश्रुत आहे. असं सर्व असलं तरी महाराष्ट्राने खेळाकडे आणि खेळाडूंकडे कधीच संकुचित दृष्टिकोनातून पाहिले नाही. अगदी आज त्याची ख्याती जगभरात पोहोचली तरी सर्वांनी पृथी शॉ या नम्र आणि गुणी खेळाडूंकडे केवळ भारतीय क्रिकेटचा उगवता तारा असच पाहिलं आहे.
आज मात्र एका उंचीवर पोहोचताच तो एक भारतीय खेळाडू आहे, यापेक्षा तो मूळचा बिहारचा आहे याची आठवण काही बुद्धी भ्रमिष्ट राजकारण्यांना झाली आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला उजेडात आणण्यासाठी पृथ्वी शॉ सारख्या गुणी खेळाडूचा उपयोग स्वतःच्या पब्लिसिटीसाठी केला जात आहे हे दुर्दैव आहे. त्यासाठी पृथ्वी शॉला बिहारची जोड देऊन त्याचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडून काहीतरी हेतू पुरस्कर पसरविण्याचा प्रयत्नं केला जात आहे असं वृत्त आहे. काँग्रेसचे बिहारीमधील खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी मनसेवर बेछूट आरोप केले आहेत.
वास्तविक या महाशय खासदारांना पत्रकारांनी गुजरातमध्ये बिहारी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न विचारला असता अखिलेश प्रसाद सिंह थेट पृथ्वी शॉ चं उदाहरण देऊ लागले. पृथ्वी हा बिहारच्या गया जिल्ह्यातील मानपूरचा रहिवासी आहे. मात्र त्याला महाराष्ट्रात हे सांगू दिलं जात नाहीये. बिहारी असल्याचा उल्लेख केला तर खेळू देणार नाही अशी धमकी मनसेकडून पृथ्वीच्या परिवाराला दिली जात असल्याचं, अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या धमकीची खबर अजून आयसीसी, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट टीम, स्वतः पृथ्वी शॉ आणि त्याच्या कुटुंबियांना सुद्धा माहित नसताना या महाशयांना ही खबर लागली कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस खासदाराने केलेल्या आरोपावर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “आम्ही कोणालाही धमकी देण्याचं कारणच नाही. कोणही उपटसुंभ आमच्याबद्दल काहीही बोलेल. जर पृथ्वी शॉला धमकी मिळाली असेल तर तो किंवा त्याचे आई-वडील यावर काहीही बोलले नसताना ते बिहारच्या खासदाराला कसं समजलं? या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पृथ्वीच्याच घरच्यांना विचारा असंही संदीप देशपांडे म्हणाले.
