मुंबई : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्या बरोबर सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपल्या उमेदवारांच्या २ याद्या जाहीर देखील केल्या. परंतु १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरे मनसेचा लोकसभेबाबतचा निर्णय जाहीर करतील याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यात राज ठाकरे आघाडी सोबत जाणार कि स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मनसेला अपेक्षित असलेल्या ईशान्य मुंबई आणि कल्याणच्या जागेवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार घोषित केले आहेत.

अर्थात या पार्श्वभूमीवर आता मनसे स्वबळावर लढणार असाच काहीसा प्राथमिक अंदाज आहे. पण, राज यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत भूमिकेबाबतचा सस्पेंन्स कायम ठेवला. अखेर लोकसभेबाबतची भूमिका जाहीर करण्यासाठी 19 मार्च ही तारीख मनसेनं निश्चित केली आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा येथे होणार असून त्या दिवशी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

२०१४ साली राज ठाकरेंनी काही ठराविक जागाच लढवल्या होत्या आणि त्यात त्यांच्या उमेदवारांना काही जागी हजारो आणि लाखो मध्ये मतदान देखील झालं परंतु त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. सध्या त्यांनी सुरु केलेलं “मोदी मुक्त भारत अभियान” लक्षात घेता ते निवडणूक लढवू अथवा ना लढवू परंतु ते मोदी विरोधासाठी लोकसभा निवडणुकी दरम्यान सभा घेणार आहेत हे निश्चित. राष्ट्रवादीने मनसेला आघाडीत घेण्यासाठीही प्रयत्न केला मात्र काँग्रेसने विरोध केल्याने मनसेला आघाडीत स्थान मिळाले नाही.

निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन काही दिवस उलटले तरी अजून राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

Raj thackeray has decided whether to contest parliamentary election or not, decision will get reveal on 19 march