#ApnaBoothSabseMajboot भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये भाजपचा संवाद संघटन मेळावा होणार होता. मात्र अमित शहांच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते व बुथ प्रमुखांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित असतानादेखील मेळाव्याकडे पाठ फिरवली. खासदार, चार आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आदी असूनदेखील जाहीर केल्याप्रमाणे पाच हजार कार्यकर्तेदेखील भाजप नेत्यांना जमा करता आले नाहीत. मोकळ्या खुर्च्या पाहून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपले भाषण आटोपते घेत काढता पाय घेतला.
देशात असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा दिसून आली. सांगलीतील संघटन संवाद या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवली. कार्यालयातील शेकडो खुर्च्या ह्या रिकाम्या पडल्या होत्या. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्ता मिळविल्यास पुढच्या ५० वर्षात भारतात कोणत्याही पक्षाला सत्ता आणता येणे केवळ अशक्य असेल असा विश्र्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
सांगलीला हा तिसरा धक्का आहे, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी दहा मिनिटातच आपले भाषण आटोपते घेतले. भाजपने मोठा गाजावाजा करत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मात्र ऐनवेळी अमित शहांचा दौरा रद्द झाल्याने कार्यक्रमावर विरजण पडलं.
